चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. "शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
"पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिंगणगाव आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
हिंगणगाव येथील मच्छबीज केंद्रावर सकाळी ९:०० वाजता सर्व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ एकत्र जमणार असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "एकजुटीने लढा, हक्क मिळवा!" चा नारा देत शेतकरी आता रस्त्यावर उतरणार असल्याने उद्या हिंगणगावात काय घडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या