इंदापूर:"-राजकारणात 'नेते बदलतात, पण निष्ठा बदलत नाही' असं म्हणतात. पण सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाने जो नवा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सुरू केलाय, तो पाहून बिचाऱ्या मतदारांच्या डोक्याचा पार दही झालाय! आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इंदापूरच्या पालखी मार्गाच्या (इंदापूर-अकलूज पट्टा) पाहणी दौऱ्यावर आले होते. गडकरी आले तर रस्ते चकाचक होणार हे उघडच आहे, पण त्यांच्या गाडीत जी 'राजकीय सरमिसळ' बसली होती, ती पाहून इंदापुरातल्या जनतेने थेट कपाळावर हात मारून घेतलाय.
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सुनेत्राताई पवार गट - महायुती) चे कृषीमंत्री दत्तूमामा भरणे बसलेले. दुसऱ्या बाजूला काल-परवापर्यंत भाजपमध्ये असलेले आणि आता थेट तुतारी हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे हर्षवर्धनभाऊ पाटील. तर खाली स्वागताला भाजपचे प्रदीपदादा गारटकर आणि प्रवीणभैय्या माने!
बाप रे बाप! अशी खिचडी तर हॉटेलमध्येही मिळत नाही. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडायचे बाकी ठेवले होते, ते सगळे नेते आज नितीन गडकरींच्या 'हायवे'वर एकाच गाडीत अगदी 'गुण्यागोविंदाने' फिरत होते.हा अभूतपूर्व सोहळा पाहून इंदापूरच्या चहाच्या टपरीवर आज एकच चर्चा रंगली होती:
अहो भाऊ, कालपर्यंत हे एकमेकांना बघून तोंड फिरवत होते, आज एकाच गाडीत बसून खड्डे मोजत आहेत! उद्या आम्ही कोणाच्या नावाचा जयजयकार करायचा?" — एक वैतागलेला मतदार.
जनतेने यातून काय बोध घ्यावा? बोध हाच घ्यायचा की: कार्यकर्त्यांनो, तुम्ही एकमेकांची डोकी फोडून घ्या, नेते शेवटी एसी गाडीत एकत्रच फिरणार! पक्ष कोणताही असो, 'गडकरी साहेबांचा निधी' सर्वांनाच प्रिय असतो.पाहणी दौऱ्यात गडकरींनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या, पण कार्यकर्त्यांच्या मनात वेगळाच 'हायवे' धावत होता. हर्षवर्धनभाऊ मनात म्हणत असतील, "निधी आमचाच, कारण आम्ही 'तुतारी' वाजवून रस्ता आणलाय!" तर दत्तूमामा मनात म्हणत असतील, "घड्याळ तर आमचंच चालतंय, रस्ता कसा काय तुमचा?" आणि बिचारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते लांबूनच बघत विचार करत होते, "या दोघांच्या नादात आमचे कमळ नक्की कुठे उमलणार?"
इंदापूरच्या राजकारणाने आज सिद्ध केलं की, इथे विचारधारा, पक्ष, गट-तट सगळं 'खड्ड्यात' गेलंय! जो रस्ता पालखीसाठी बनतोय, त्याच रस्त्यावरून हे चारही नेते आगामी निवडणुकीत आपापली राजकीय 'दिंडी' कशी काढतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.आशी सामान्य जनतेत चर्चा आहे.
टिप्पण्या