भलतंच अंतर..! शाळेपासून घर फक्त ३४ सेंटीमीटर..? आरटीई प्रवेशाच्या 'घोटाळा एक्स्प्रेस'चा पर्दाफाश..! - सौ.अनिताताई खरात
इंदापूर: गरिबांच्या मुलांच्या हक्काच्या आरटीई (RTE) प्रवेशावर यंदा श्रीमंतांनी आणि काही 'जुगाडू' पालकांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेपासून घर लांब असूनही चक्क ३४ सेंटीमीटर, ३७ सेंटीमीटर आणि ४७ सेंटीमीटर एवढ्या "नगण्य" अंतरावर घर असल्याचे दाखवून अनेकांनी प्रवेश लाटले आहेत. आता प्रश्न असा पडला आहे की, हे विद्यार्थी शाळेच्या आवारातच राहतात की काय?
सेंटीमीटरचा अजब खेळ शाळेपासून घराचे अंतर किमीमध्ये असण्याऐवजी चक्क काही सेंटीमीटर दाखवून गुपचूप प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. ३४ सेंटीमीटर म्हणजे एका फुटापेक्षा थोडे जास्त! इतक्या अंतरावर घर असू शकते का? असा सवाल तेजपृथ्वी (फाउंडेशन) ग्रुप'ने उपस्थित केला आहे.
अनेक धनदांडग्यांनी आणि राजकारण्यांनी पैशांच्या जोरावर शाळेच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या नावे खोटे भाडेकरार (Rent Agreement) बनवून घेतले आहेत. विशेष म्हणजे, हे करार शाळा सुटल्यानंतरच्या तारखेचे असल्याचेही पत्रात म्हटले आहे. आरटीईचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देणे हा आहे. मात्र, इथे २५-३० किमी लांब राहणारी श्रीमंतांची मुले स्वतःच्या बसने शाळेत येतात, तरीही कागदावर ती 'नजदीक' दाखवली जात आहेत.
गेल्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. पण यंदा "आम्ही गप्प बसणार नाही," असा सज्जड इशारा सौ. अनिताताई नानासाहेब खरात (संस्थापक अध्यक्षा तेजपृथ्वी ग्रुप) यांनी शिक्षण विभागाला दिला आहे.
शासनाने तातडीने या अर्जांची दोन दिवसांत चौकशी करावी. ज्यांचे घर खरोखर ३४ किंवा ५० सेंटीमीटरवर आहे, ते नेमके कुठे राहतात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. जर यात सत्यता नसेल, तर हे बोगस प्रवेश रद्द करून खऱ्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
आरटीईच्या या गोंधळाकडे पाहता, आता पालकांना घराचा पत्ता सांगताना 'पिनकोड' सोबत 'पट्टी' (Scale) घेऊनच फिरावं लागणार असं वाटतंय!
टिप्पण्या