उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?
उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे 'खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे.
वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फेकला की 'प्रशासन झोपते' असे चित्र आहे. डोळ्यावर हप्त्याची पट्टी बांधल्यामुळे की काय, धडधडणारे सक्शन पंप आणि रात्रभर चालणारी वाळूची अवैध वाहतूक अधिकाऱ्यांना दिसत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, इंदापूरच्या बॅकवॉटरमधील गावागावांत आता नवीन 'रोजगार' उपलब्ध झाला आहे.
चौकात बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवणे.
मानधन दिवसाला तब्बल १००० रुपये रोख त्याची
कार्यपद्धती साहेब निघाले की लगेच 'सिग्नल' दिला जातो. पोलीस येण्यापूर्वीच वाळूचे ट्रक गायब..!
हे 'भामटे' लोक हजार रुपयांच्या हजरीसाठी प्रशासकीय यंत्रणेला चकवा देत आहेत आणि प्रशासन मात्र 'आंधळी कोशिंबीर' खेळण्यात मग्न आहे.
तालुक्यातील राजकीय धुरिण आणि वजनदार नेते आ. दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा नेते प्रवीण माने आणि प्रदीपदादा गारटकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळत असल्याच्या चर्चेमुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे.आज जर या अवैध धंद्यांना लगाम घातला नाही, तर उद्या उजणीच्या काठावर मुडदे पडतील आणि या अराजकतेला सर्वस्वी प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व जबाबदार असेल." - स्थानिक नागरिकांचा संताप.
जर पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई केली नाही, तर इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचे शिष्टमंडळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. "तुमच्या राज्यात हे काय चाललंय?" असा सवाल विचारण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे.
प्रशासनाने वेळीच डोळ्यावरची पट्टी काढली नाही, तर उजणीची वाळू उद्या कुणाच्या तरी रक्ताने माखलेली दिसेल. साहेब, गांधींची चटक लागली असेल तर ती उतरवण्यासाठी जनतेचा संताप पुरेसा आहे! आता तरी 'खाकी' व तहसीलदार जागे होणार की मुख्यमंत्र्यांच्या दरबारातच साहेबांची इज्जत निघणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
टिप्पण्या