इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले.
भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी इंदापूर तालुक्यातील तसेच माढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर येथे भेटून निवेदनाद्वारे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. सदर भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, सु. स. खांडेकर अधिक्षक अभियंता उजनी धरण यांच्याशी भीमा नदीत पाणी सोडणे संदर्भात परिस्थितीची माहिती देत चर्चा केली होती.
तसेच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 16) रोजी झालेल्या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नदीमध्ये पाणी सोडणे संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत आग्रही भूमिका घेतली होती. त्याचबरोबर उजनी पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पावसाळ्यापर्यंत पाणी पुरले पाहिजे व उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांना पाणी कमी पडू देऊ नये, अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी मांडली. सदर ऑनलाईन बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचेसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
_____________________________
फोटो:-इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त केले.
टिप्पण्या