हिंगणगाव येथे महामार्गावरील गोकुळ वाईन्स च्याच बोर्डमुळे वाहनधारकांचा जीव जाणार..! जबरदस्त अपघात होणार..!
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत वळण रस्ता असतानाही, रस्त्यालगत लावण्यात आलेल्या एका मोठ्या जाहिरात बोर्डमुळे वाहनधारकांना समोरील वाहने दिसण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून, टोलनाका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
हिंगणगाव परिसरात महामार्गाला मोठे वळण आहे. याच वळणावर 'गोकुळ वाईन्स बार अँड लॉजिंग' नावाचा एक मोठा फलक (बोर्ड) अगदी रोडलगत लावण्यात आला आहे.
वळण घेताना समोरून येणारी वाहने या बोर्डमुळे वेळेवर दिसत नाहीत.
वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या नियमांनुसार वळणावर किंवा 'व्हिजिबिलिटी' बाधित होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक लावणे धोकादायक आहे, मात्र तरीही हा बोर्ड हटवण्यात आलेला नाही.
महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि अडथळे दूर करण्याची जबाबदारी संबंधित टोलनाका व्यवस्थापनाची आहे. मात्र, इतका मोठा धोका समोर दिसत असतानाही टोलनाका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
वळणावरचा हा बोर्ड एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. टोल प्रशासनाने तातडीने हा अडथळा दूर करावा, अन्यथा एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण?" असा सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालक विचारत आहेत.आता या गंभीर बाबीवर टोलनाका प्रशासन तातडीने कारवाई करून तो धोकादायक बोर्ड हटवणार का,किती अपघात होतात याची वाट पाहात आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या