उजनी धरणग्रस्तांचा मोठा विजय: पीपीपी तत्त्वावरील जमीन मोजणी शेतकऱ्यांनी रोखली; हर्षवर्धन पाटलांच्या मध्यस्थीनंतर अधिकारी परतले
इंदापूर:-राज्य शासनाच्या १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाचा (GR) आधार घेत, उजनी धरणातील संपादित जमिनी 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (PPP) अंतर्गत खाजगी उद्योजकांना देण्याच्या हालचालींना इंदापूर तालुक्यात मोठा विरोध झाला आहे. तरडगाव आणि हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रस्तावित जमिनीची मोजणी रोखून धरली. अखेर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मोजणी अधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शासनाने उजनी धरण क्षेत्रातील संपादित जमिनी पीपीपी तत्त्वावर बड्या उद्योगपतींना ४९ वर्षांच्या कराराने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या जमिनीवर अनेक धरणग्रस्त शेतकरी वर्षानुवर्षे आपली उपजीविका करत आहेत.
आमच्या हक्काच्या जमिनी शासन खाजगी उद्योजकांच्या घशात घालत आहे. ज्या जमिनीवर आमचे पोट अवलंबून आहे, त्या जमिनी हिसकावून घेण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू."
शासन निर्णय १७ जून २०१९ व ८ ऑक्टोबर २०२५ अन्वये ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे,
तरडगाव-हिंगणगाव परिसरात ठिय्या आंदोलन
आज सकाळी मोजणी अधिकारी आणि कर्मचारी तरडगाव व हिंगणगाव परिसरात जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. ही बातमी समजताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. आपल्या जमिनी जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध दर्शवला आणि काम थांबवण्यास भाग पाडले.
हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी,परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पाटील यांनी तत्काळ संबंधित मोजणी अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. "शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचवून कोणतीही मोजणी करू नका, धरणग्रस्तांच्या भावनांचा विचार व्हावा,"अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. हर्षवर्धन पाटील यांच्या फोननंतर आणि शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहून मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी न करताच माघार घेण्याचा निर्णय घेतला.मोजणी पथक माघारी फिरताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. "आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ," असा निर्धार यावेळी मा.किसन तात्या भांगे व उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन पाटील यांनी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या