शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामाअखेर गाळप झालेल्या सर्व ऊसाला पहिला हप्ता प्रती टन रु. 3101 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि.20) जमा करण्यात आला आहे. राज्यात चालू गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या सर्व ऊसाची बिले शेतकऱ्यांना अदा करणारा नीरा भीमा कारखाना हा बहुधा पहिला कारखाना आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा चालु सन 2025-26 चा गळीत हंगाम दि. 6 फेब्रुवारी अखेर संपन्न झाला. या हंगामामध्ये कारखान्याने 525657 मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. या हंगामामध्ये गाळप झालेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहेत. सदरच्या गाळपाबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच हितचिंतक या सर्वांचे कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची बिलेही नियमितपणे अदा करण्यात आली आहेत. आगामी सन 2026-27 च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी गाळपासाठी कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आतापासूनच संचालक मंडळाने नियोजन सुरु केले आहे, अशी माहितीही भाग्यश्री पाटील यांनी दिली.
___________________________
टिप्पण्या