पुणे, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.
शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. 'सी-व्हिजील' ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा, त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. पक्षांनी परवानगी घेतलेल्या खाजगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सांगितले.
निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यात मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या