इंदापूर: महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये सोमवारी (दि.13) एका दिवसामध्ये उच्चांकी 9775 मे.टन ऊसाचे गाळप करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशी माहिती माजी मंत्री,कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.
कर्मयोगी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 8000 मे.टन एवढी असताना एका दिवसामध्ये उच्चांकी 9775 मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याने आज अखेर 2 लाख 61 हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मिती आदी सर्व उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प हे पुर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. चालू हंगामात गाळप झालेल्या ऊसास प्रति टन रु. 2500 पेक्षा जास्त (प्लस ) दर दिला जाणार असून, शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रु. 2100 प्रमाणे नियमितपणे अदा केला जात आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना ही आपली संस्था असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे चालू हंगामामध्ये कारखाना सुमारे 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट निश्चितपणे पुर्ण करेल, असा विश्वासही अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.
यावेळी हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी उपस्थित होते. कर्मयोगी कारखान्याने गाळपामध्ये आघाडी घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी त्याचबरोबर कारखान्याशी संबंधित सर्वच घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पण्या