इंदापूर : विशेष प्रतिनिधी
दि. २१ सप्टेंबर पासून कार्यकारी अभियंता उजनी, यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ (दि. ३०) रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्ष ( कवाडे गटा) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली आहे.
मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहासाठी ह्या शेतकऱ्यांना कसण्यास द्यावी. तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच्या आराखड्याचे जे काम सुरु आहे. या आराखड्यामधून मौजे रांझणी जमीन गट क्र. ५५/५६ वगळावे. त्याचप्रमाणे प्रशासना मधील संबंधित जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन उजनी धरण गेटवर कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सुरु आहे.
अद्यापपर्यंत संबंधित प्रशासनाकडून आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ दि. ३० सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा संजय सोनवणे यांनी दिला आहे.
टिप्पण्या