इंदापूर:
राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहिला आहे. राज्य सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, हे सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र भाजप ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही असून, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बुधवारी (दि.15) केली.
इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार श्रीकांत पाटील यांना ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षण कायम राहावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, हा आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. गेली सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला सातत्याने सांगितले. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत, असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.
तसेच इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुका सध्या जाहीर झाल्या आहेत. राज्य सरकारने स्वतःच्या अधिकारात निवडणुकांना एक वर्षासाठी स्थगिती द्यावी, अशी मागणी याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, मारुतराव वनवे, अँड. कृष्णाजी यादव, तानाजी थोरात, नगरपालिकेतील गटनेते कैलास कदम, माऊली चवरे, पांडुरंग शिंदे, गजानन वाकसे, धंनजय पाटील, राजकुमार जठार, संपत बंडगर, आकाश वनवे, तेजस देवकाते, राम आसबे, दीनानाथ मारणे, सुयोग सावंत, शितल साबळे, प्रेमकुमार जगताप, तुळशीराम भोंग, जालिंदर राऊत, अंकुश राऊत, विठ्ठल मिसाळ, अंकुश राऊत, रोहिदास राऊत, आबा गंगावणे, रमेश राऊत, रणजित निकम, सुजित गायकवाड व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
___________________________
फोटो:- इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना ओबीसींना राजकीय आरक्षण कायम राहावे,या मागणीचे निवेदन दिले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
टिप्पण्या