इंदापूर:- मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन (हाय स्पीड रेल्वे) पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून जाणार आहे. या बुलेट ट्रेन साठी जमिन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, बागायती शेतीचे नुकसान होऊ नये असा रेल्वे मार्ग निवडावा, संपादित जमिनीला चांगला मोबदला देण्यात यावा, असे निवेदन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे सोमवारी (दि.26) दिले व यावेळी त्यांचेशी सविस्तरपणे चर्चाही केली. याप्रसंगी माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.समाधान आवताडे, राज्य साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपस्थित होते. दरम्यान,बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा बुलेट ट्रेनचा मार्ग असेल, संपादित जमिनीस समाधानकारक मोबदला दिला जाईल तसेच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिष्टमंडळास दिली.
केंद्र सरकारचा मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग जाणाऱ्या इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्यातूनही हा रेल्वे मार्ग जाणार आहे. इंदापूर तालुक्यात एकूण 4 प्रस्तावित मार्गाचे रेल्वेने सर्वेक्षण केले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन प्रकल्प देशहीताचा असल्याने व स्थानिक परिसराचा विकास होणार असल्याने बुलेट ट्रेनला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र बुलेट ट्रेन मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शक्यतो जिराईत जमिनीचा विचार व्हावा, संपादित जमिनीला अतिशय चांगला मोबदला मिळावा, संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रेल्वे नोकरीत प्राधान्य व इतर लाभ मिळावेत, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण एकमेकांशी संपर्कात राहू, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात ग्वाही दिल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
________________________________
टिप्पण्या