इंदापूरः तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2020-21 या ऊस गळीत हंगामामध्ये आज (दि.18 ) अखेर 4 लाख 25 हजार 130 मे.टन गाळप पुर्ण करून ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. सध्या दररोज सुमारे 9000 ते 9100 मे.टन क्षमतेने गाळप केले जात आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले यांनी दिली.
चालू हंगामात कारखान्याने 14 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,450 ट्रक - ट्रॅक्टर, 400 ट्रॅक्टर गाडी व 350 बैल गाड्या मार्फत संपूर्ण तोडणी प्रोग्रॅम संगणकीकृत पणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक पंधरवड्याला ऊस बिलाचा हप्ता नियमितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केला जात आहे,असे त्यांनी नमूद केले.
कर्मयोगी कारखान्याने ऊस गाळपात जिल्ह्यात आघाडी घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांचे प्रयत्नाने आणि हितचिंतकांच्या प्रेरणेने चालू हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल,असा विश्वासही हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा श्रीमती पदमाताई भोसले यांनी व्यक्त केला.
टिप्पण्या