भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ सरसकट पंचनामे व मदतीची मागणी
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी, गिरवी या गावांमध्ये या वादळी पावसाने मुख्यत्वे थैमान घातले. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागांचेही अतोनात नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस वाऱ्यामुळे आडवा झाला आहे.
नेत्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी
या भीषण परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व नेते प्रविण माने यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी वडापुरी, सुरवडसह विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या थेट शेतातील बांधावर जाऊन पिकांच्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना धीर दिला.
तात्काळ शासकीय मदतीची व पंचनाम्यांची मागणी
या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाकडे तीव्र शब्दांत मागणी करताना नेते म्हणाले की, कृषी विभागाने कोणत्याही दिरंगाईशिवाय तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच सरसकट आणि योग्य नुकसानभरपाई त्वरित जाहीर करावी. शेतकरी आधीच विविध आर्थिक संकटांचा सामना करत असताना या नव्या संकटामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे.
कृषिमंत्र्यांनी तालुक्याला सढळ हाताने मदत करावी: प्रदीप गारटकर
"राज्याचे कृषी मंत्री स्वतः इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांनी तालुक्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दाहकता ओळखून सढळ हाताने आणि तातडीने मदत करावी. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना अशा नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे शासनाने तात्काळ संवेदनशील भूमिका घेऊन विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटात अजिबात खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील."
— प्रदीप गारटकर (ज्येष्ठ नेते, भाजपा)
टिप्पण्या