भक्तांच्या वाटेत खड्डे अन् प्रशासनाच्या खिशात टोल;संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर-अकलुज रस्तेकामाचा बोजवारा..!
इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे 'राष्ट्रीय महामार्ग' म्हणून मोठ्या थाटामाटात नामकरण झाले खरे, मात्र जमिनीवरची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. इंदापूर ते अकलुज दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळलेले असताना, दुसरीकडे वाहनधारकांकडून मात्र सक्तीने टोल वसुली सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इंदापूर-अकलुज भागात अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण अपूर्ण आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रस्ता पूर्ण झालेला नसतानाही टोल नाका मात्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. "रस्ता नाही तर टोल कशाचा?" असा सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे.
या मार्गावरील बावडा येथील बायपासचे काम रखडल्याने हा भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला नाही. बायपास बंद असल्याने वाहतुकीचा सर्व ताण मुख्य गावातून किंवा अरुंद रस्त्यांवरून येत आहे. परिणामी, दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.
अपूर्ण उड्डाणपूल: अनेक ठिकाणी पूल आणि सर्व्हिस रोडची कामे अर्धवट स्थितीत आहेत.
धुळीचे साम्राज्य: कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्याशेजारील दुकानदारांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सुरक्षेचा अभाव: अपूर्ण कामाच्या ठिकाणी आवश्यक ते दिशादर्शक फलक किंवा रेडियम इंडिकेटर्स नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे जीवावर बेतू शकते.
"वारी जवळ येत आहे, लाखो वारकरी या मार्गावरून चालत जाणार आहेत. प्रशासनाने केवळ टोल वसुलीकडे लक्ष न देता आधी रस्ता सुरक्षित करावा. बावडा बायपास तातडीने सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल."
रस्त्यावरील खाजगी फलकांचा सुळसुळाट
महामार्गाच्या कडेला आणि काही ठिकाणी चक्क मुख्य रस्त्याच्या दृष्टीक्षेपात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खाजगी जाहिरातींचे फलक (होर्डिंग्स) लावले गेले आहेत. हे फलक वाहनचालकांचे लक्ष विचलित करत असून, यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. 'नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का?' असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
प्रमुख समस्या:
* स्वच्छतागृहांची दुरवस्था: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय.
* पिण्याच्या पाण्याची सोय नाही: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल.
* अडथळे निर्माण करणारे फलक: वळणांवर लावलेल्या फलकांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.
* पालखी मार्गाची प्रतिमा: वारकरी आणि भाविकांच्या श्रद्धेचा हा मार्ग असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित कंत्राटदाराने केवळ टोल वसुलीवर लक्ष न देता, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे आणि सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे अनधिकृत फलक तातडीने हटवून टोलनाक्यावर मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. जर लवकर सुधारणा झाली नाही, तर स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..
टिप्पण्या