इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे काही दिवसांपासून तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नावर अपुरी व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. मंत्रिपदावर व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी, अशी टीका भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केली .
इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे शनिवारी(दि.14) पत्रकार परिषद घेतली. सदर पत्रकार परिषदेत राज्यमंत्र्यांनी दिलेली माहिती कशी दिशाभूल करणारी आहे, हे हर्षवर्धन पाटील यांनी दाखवून दिले.
ते पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी उपसा योजनेसाठी खर्च किती येणार आहे ? अर्थसंकल्पात नक्की किती रक्कमेची तरतूद प्रस्थावित आहे, हे राज्यमंत्री का सांगत नाहीत. ह्या योजनेचे काम कधी सुरू होणार ? योजनेमध्ये इंदापूर तालुक्यातील ते म्हणतात त्याप्रमाणे 11 कोणती गावे आहेत ? शेतकऱ्यांना कधी पाणी मिळणार ? वीज बील शेतकरी भरणार की शासन भरणार? तसेच या योजनेसाठी उजनी धरणातील किती पाण्याची तरतूद केली आहे? याची काहीच माहिती न देता योजना पूर्ण झाल्याच्या आविर्भावात राज्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन फक्त तकलादू व दिशाभूल व फसवणूक करणारी माहिती देत आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लाकडी-निंबोडी योजनेचा मी पाठपुरावा करून सन 2010 ते 2012 मध्ये सर्वे केला व आराखडा तयार करून उजनी धरणातून 1 टीएमसी पाण्याची तरतूदतही केली होती. मात्र त्यावेळी राज्यात सिंचन घोटाळ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन राज्यपाल यांनी कोणत्याही नवीन सिंचन योजनेस परवानगी दिली नाही.
भाटघर, खडकवासल्याचे इंदापूर तालुक्याच्या हक्काचे सर्व पाणी सध्या शेतीसाठी राज्यमंत्री हे आमदार असताना व आता दीड वर्षे मंत्री असताना तालुक्यात देऊ शकले नाहीत, ते तालुक्यासाठी शेतीला जादा पाणी आणण्याचा प्रश्न कसा सोडवतील, असा सवालही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.
उजनी धरणातून शेटफळगढे येथे खडकवासला कालव्यात पाणी टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे, अशी फसवी व दिशाभूल करणारी वक्तव्ये राज्यमंत्री पदावरील जबाबदार व्यक्ती करीत आहे. सदर योजनेसाठी उजनी धरणातून किती पाण्याची तरतूद केली आहे? किती निधी लागणार आहे? याची ठोस माहिती न सांगता फक्त विकासाच्या पोकळ गप्पा मारून राज्यमंत्र्यांकडून सध्या शेतकऱ्यांची चक्क फसवणूक करण्याचे काम चालू आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणार अशी घोषणा दीड वर्षापासून ऐकत आहे. कधी 2 तर कधी 4 बुडीत बंधाऱ्यांचा आकडा राज्यमंत्री सांगत आहेत. या बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर नसताना राज्यमंत्री शेतकऱ्यांना फसवत आहेत.
टाटांच्या मुळशी धरणाचे पाणी हे पुणे शहराला देऊन पुणे शहराचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळवून देऊ,असे राज्यमंत्र्यांनी इंदापूर पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यमंत्र्यांनी आपल्या आवाक्यात नसणारी अशी धादांत फसवी वक्तव्ये करू नयेत, जनता त्यांच्या खोट्या आश्वासनांना फसणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
* चौकट:-
दीड वर्षात भाटनिमगाव बंधाऱ्यांची दुरुस्ती करता आली नाही -हर्षवर्धन पाटील
-------------------------------------------------
इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या गप्पा मारणाऱ्या राज्यमंत्र्यांना मंत्रिपदावर आल्यानंतर दीड वर्षात साध्या भाटनिमगाव बंधाऱ्यांची दुरुस्ती करता आली नाही. सध्या हा बंधारा दुरुस्त न केल्याने पाण्याअभावी कोरडा पडला आहे. तालुक्याचा निधीचा महापूर आला आहे, अशी स्वतः टिमकी वाजविणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणे थांबवावे,अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.
_______________________________
टिप्पण्या