इंदापूरः तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपचेच निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले असल्याची माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' इंदापूर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये बहुमताने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असून या निवडीत भाजपचे सर्वाधिक 38 सरपंच व उपसरपंच झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील जनतेने तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सत्ताधार्यांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला आहे.
भाजपच्या बाजूने चांडगाव, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, भिगवन, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारवाडी, गोतंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं. 2, बाभुळगाव, गोंदी, भांडगाव, नृसिंहपूर, टणू,भोडणी, कचरवाडी( बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव) अशा 38 ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच भारतीय जनता पक्षाचे झाले आहेत तर चार ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र चित्र आहे तर उर्वरित ग्रामपंचायती विरोधकांकडे गेल्या आहेत.
भाजपलाच जनादेश मिळाला असून तालुक्यातील जनता सक्षमपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे तसेच सभापती, सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अत्यंत हिरहिरीने काम करून इंदापूर तालुक्यामध्ये भाजपच्या विचारांची ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता आणली त्याबद्दल या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनापासूनचे मी आभार मानतो.
ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय आता संपला असून कार्यकर्त्यांना आवाहन करतो की गावात शांतता राहावी, सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करावा. निवडून आलेले सरपंच व उपसरपंच, सदस्यांचे मनापासूनचे अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
चौकट 1 :- कळंब ग्रामपंचायत सरपंच निवडीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली असली तरी स्पष्ट बहुमत भाजपचेच आहे त्यामुळे सत्तेच्या चाव्या आमच्याकडेच राहणार.
चौकट 2 :- चांडगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीसाठी बहुमत आहे परंतु आरक्षण प्रतिनिधी नसलातरी सत्ता भाजपचीच राहणार.
टिप्पण्या