कर्मयोगी कारखान्याचे ऊस बिल थकले; शेतकरी हवालदिल, आंदोलनाचे संकेत,शासकीय अनुदान लाटण्याच्या तांत्रिक अट्टाहासामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडवले
इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारखान्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ शासकीय अनुदान लाटण्याच्या तांत्रिक अट्टाहासामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
कर्मयोगी साखर कारखान्याचे व्यवस्थापन सध्या ओंकार शुगर युनिट (बाबूराव बोत्रे पाटील) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले खरे, मात्र नियमानुसार १४ दिवसांच्या आत मिळणारे ऊस बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या तिजोरीत बिले देण्याइतपत रक्कम उपलब्ध आहे. तरीही, राज्य किंवा केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विशिष्ट अनुदानांच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक 'पेमेंट' उशिरा करत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे.
बाबूराव बोत्रे पाटील यांच्या 'ओंकार शुगर'ने कारखाना चालवायला घेतल्यापासून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. मात्र, सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे अडकल्याने व्यवस्थापनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
* आर्थिक ओढाताण: खते, मजुरी आणि घरखर्चासाठी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.
* अनुदानाचा अट्टाहास: स्वतःचा फायदा पाहताना कारखान्याने उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे.
इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेतकरी आजवर शांत आहे. "साहेब मार्ग काढतील" या आशेने शेतकरी वर्गाने संयम पाळला आहे. मात्र, पोटचा गोळा असलेल्या उसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने हा संयम आता सुटत चालला आहे.
"आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या आदरुखातर गप्प आहोत, पण कारखान्याने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. घर चालवायला पैसे नाहीत आणि कारखाना अनुदानाची वाट पाहत आमची बिले अडवून धरत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही
."- मा.किसनराव(तात्या)भांगे,- एक संतप्त ऊस उत्पादक शेतकरी
शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकरी आता आक्रमक भूमिकेत आहेत. जर पुढील काही दिवसांत थकीत बिले व्याजासह जमा झाली नाहीत, तर कारखान्यावर धडक मोर्चा काढण्याचा आणि कारभाराचा पंचनामा करण्याचा इशारा दिला जात आहे.
या सर्व प्रकरणावर कारखाना प्रशासन किंवा ओंकार शुगरचे व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. "शेतकरी राजा" संकटात असताना सहकार क्षेत्रातील ही 'राजेशाही' मोडकळीस येणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
टिप्पण्या