*महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे निश्चित विजयाची हॅटट्रिक करणार, इंदापूर तालुक्याचे पाण्याच्या प्रश्नासह इतर प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबध्द : अजित पवार.*
इंदापूर,
डॉ. संदेश शहा.
राज्याचे भवितव्य ठरविणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत
महायुतीस पोषक वातावरण असल्याने महायुती पुन्हा सत्तेवर निश्चित येणार आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे लोकप्रिय कर्तबगार उमेदवार दत्तात्रय भरणे हे विजेतेपदाची निश्चित हॅटट्रिक करतील मात्र तुम्ही त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात झालेल्या महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विराट प्रचार सांगता सभेत ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, महायुती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वाट्यास विधानसभा निवडणुकी त ५८ जागा आल्या असून आपण त्यामधील २० टक्के ओबीसी, साडे बारा टक्के एसटी, मुस्लिम समाज १० टक्के, महिलांना १० टक्के प्रतिनिधित्व देत समतेचा, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार पुढे नेत आहोत. दत्तात्रय भरणे यांनी सत्ता असो वा नसो, आपल्या आमदारकीच्या काळात दोन वर्ष कोरोना साथ सोडून केवळ तीन वर्षातच ६२६३ कोटी रुपयांची विकासकामे खेचून आणली आहेत. दत्ता मामा तसेच आपले जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह आपणास मदत करणाऱ्या सर्व विचार सरणीचे प्रतिनिधी यांचा निश्चित मानसन्मान ठेवतील. सध्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॅक यामध्ये बसायचे दिवस राहिले नसून बुलेट ट्रेन चा जमाना आहे. सध्या मुंबई, पुणे, बारामती, इंदापूर ते पंढरपूर असा बुलेट ट्रेन चा सर्व्हे सुरू आहे. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात जागतिक बँक, जपान तसेच केंद्र सरकारच्या निधीची गरज भासणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व सर्व सहकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. बारामती नंतर आपले इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष आहे. आगामी काळात इंदापूर तालुक्याचे सर्व पाणी प्रश्न सोडविण्या साठी प्राधान्य दिले जाणार असून उजनी पर्यटन विकसित करून युवकांना रोजगार उपलब्ध केला जाईल. उजनीचे पाणी खराब झाल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड येथील सिव्हेज वॉटर खाली येवू नये यासाठी प्रयत्न केले जातील. लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणले जातील, पालखी मार्ग गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आदरणीय शंकरराव पाटील यांनी संस्था काढून त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या. मात्र त्यानंतर संस्था पूर्ण ताकतीने चालवल्या जात नाहीत. दोन्ही कारखान्यावर सभासद करून घेतले जात नाही. प्रत्येक निवडणुकीत मी या विषयावर बोलतो पण त्यामध्ये काही सुधारणा होत नाही या शेलक्या शब्दात अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करून दत्तात्रय भरणे यांना विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदी वरची इंदापूर व करमाळा तालुक्यातील शिरसवडी ते कुगाव पूल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी तसेच सुफी संत चांदशाहवली बाबा दर्गा संवर्धन, जंक्शन येथील औद्योगिक वसाहत, लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजना, दलीत, मुस्लिम समाजापर्यंत पोहोचलेला निधी, तालुक्याच्या विकासा साठी आणलेल्या ६२०० कोटी हून जास्त निधी मुळे विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एवढे काम करून सुध्दा आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वाईट वाटत आहे. आपल्या दहा वर्षाच्या काळात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे. तुमच्या वीस वर्षाच्या काळात ही कामे का झाली नाहीत याचा जाब तुम्ही विरोधकांना विचारणे गरजेचे आहे. आगामी काळात शेतीच्या पाण्याचा शाश्वत प्रश्न सोडविणे, नीरा व भीमा नदीत बुडीत बंधारे बांधणे, उजनी धरणात बुडीत बंधारे बांधणे, उजनीतील पाच टीएमसी पाणी शेटफळ गढे येथून तालुक्यात फिरवणे आदी कामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. मी कामे केली आहेत यावर तुमचा विश्वास असेल तर मला विजयी करा. मी कामे केली नसतील तर दैवत इंद्रेश्र्वर माझे वाटोळे करेल, तुम्ही खोटे बोलत असाल, लबाड वागत असाल तर मी तुमचे वाटोळे व्हावे असे म्हणणार नाही तर देव तुमचे बघून घेईल अशी उपरोधिक टीका त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.
यावेळी प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, संजय सोनवणे, हनुमंत कोकाटे, तानाजी थोरात, डॉ. शशिकांत तरंगे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रशांत पाटील, देवराज जाधव, श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, माऊली चवरे, गजानन वाकसे, दशरथ डोंगरे, युवराज पोळ, सचिन सपकळ, बाळासाहेब सरवदे, उमाताई इंगुले, बाळासाहेब ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन निलेश धापटे यांनी केले.
टिप्पण्या