इंदापूर, डॉ. संदेश शहा यांचेकडून. ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू. मात्र देशात भाजपा विरोधी लाट आहे असे प्रतिपादन करत शरद पवार यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला.
बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा झाली.
शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आमच्या पक्षाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. मात्र तसे केल्यास त्यांच्या शेतीचे पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. शेतीचे पाणी हे काही बापजाद्याची इस्टेट नाही. कुणी नोकरी टिकणार नाही म्हणतात. दमदाटी व दहशतीने त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.काही जणांना शक्ती व पाठिंबा देण्याची गरज असते, तशी भूमिका आम्ही घेतली. आज त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. पाय आणि डोके हवेत आहे, अशा शब्दात पवार यांनी अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. ती यशस्वीपणे करायची असेल तर भाजपचा निर्णायक पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही. महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा आहे. त्यांना भाजपला सत्तेतून बाजुला करुन नव्या विचारांच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे. सर्वांच्या सामुदायिक शक्तीने आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात निश्चित सत्ता येईल यात काही शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दौंड व इंदापूरात पाण्या बद्दल प्रचंड भाषणे होत आहेत. कुणी पाण्याची धमकी दिली, तर त्याचा नंबर मला पाठवा. हे कुणाच्या घरचं पाणी नाही.तो राज्याचा विषय आहे. पाण्यावर सरकारचा नाही, तर देशातील शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे. चारशे पारच्या निमित्ताने संविधान बदलण्याचे पाप विरोधकांच्या मनात आहे. यातून पाणी बंद करू वगैरे भाषणे होत आहेत, अशा त्या म्हणाल्या.
अमोल कोल्हे म्हणाले, नीती व नियत गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शरद पवार यांनी शेतक-यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली. भोपाळ मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्या तरी वेगळ्या विषयात ७० हजार कोटीचा आकडा सांगितला, त्यावर काहींनी आपली भूमिका बदलली.मात्र दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानाने लढतो, हे अनिल देशमुख यांनी दाखवून दिले.
भूषणसिंह होळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे होते. हिंमत असेल तर मोदी यांनी रामाच्या नावावर मते मागण्या पेक्षा कामाच्या नावावर मते मागावीत असे आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, इकडे असताना अजितदादा सर्व निर्णय घेत होते मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कुठेही सही करता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अजितदादा यांच्या नावातील दादा गायब झाला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून इंदापूर तालुक्यातून दीड लाख मताधिक्य घेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टिप्पण्या