इंदापूर: दिनांक ०९/०६/२०२१ रोजी शिवशाही शेतकरी संघटना या संघटनेचे इंदापुर नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष मा.श्री.अरविंद(तात्या)वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नितीन दादा आरडे यांनी याप्रसंगी संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत माहिती दिली. यावेळी पुणे जिल्हा आरपीआय संघटन सचिव शिवाजीराव मखरे, आर पी आयचे बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर पी आयचे इंदापूर तालुका अध्यक्ष संदिपान कडवळे सर, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण आरपीआयचे शहराध्यक्ष अमोल मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शिवशाही शेतकरी संघटना भूमिका
आज संपूर्ण भारत देशातील शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. एका बाजूला अवर्षण अतिवृष्टी अस्मानी संकट तर दुसर्या बाजूला शासनाची शेतकरी विरोधी धोरणे यामुळे कृषिप्रधान असलेला देश अक्षरशः कंगाल होण्याची वेळ आली आहे.
शेतीवर आधारलेले उद्योगधंदे धनदांडग्या आणि जात दांडग्या जमातीने स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नागवले आहे. त्यांची लूट केली आहे व पुन्हा सहकारी संस्था कर्जबाजारी करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला शेतीचे कर्ज तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांचे कर्ज अशा कैची मध्ये आज महाराष्ट्रातील शेतकरी सापडलेला आहे.
सत्तेच्या गाद्या उबवून सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट करणारी यंत्रणा उभी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सहकार आणि साखर सम्राटांनी केला.
एफ आर पी व एम एस पी च्या बाबत शेतकऱ्यांनी कितीही पाठपुरावा केला तरी ह्या महाभागांनी कधीही त्यास दाद दिली नाही.
सहकाराच्या सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे दुष्ट चक्र यांनी निर्माण करून सत्तेचा उपभोग घेतला व शेतकऱ्यांना भिकेला लावले.
या पूर्वीपासून अनेक शेतकऱ्यांच्या संघटना कार्यरत आहेत. परंतु त्या शेतकऱ्यांचे हित कमी आणि कारखानदार भांडवलदारांचे हित जास्त जपण्याच्या प्रयत्नात असतात/ ही वस्तुस्थिती आहे. जे कारखाने किंवा ज्या सहकारी संस्था कर्जबाजारी झाल्या आहेत. त्या कर्जबाजारी का झाल्या ? त्याचा हिशोब द्यायला कुणी तयार नाही. व शेतकऱ्यांच्या नावाने संघटना चालवणारे दर पंचवार्षिक ला आपल्याला आमदारकी खासदारकी मिळावी म्हणून भांडवलदारांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहेत.
एकूणच शेतकरी सर्व बाजूने नाडवला जात आहे. त्यामध्ये उच्चजातीय शेतकऱ्यांचे लागेबांधे हे भांडवलदार राजकारण्यांशी असल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण सहज शक्य होते.
परंतु अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाती/ जमाती, इतर मागास वर्ग जाती गटातील शेतकरी मात्र समस्यांचे निराकरण करू शकत नाही. बाजारपेठेत याची पत नसल्यामुळे खाजगी सावकाराकडे त्याला हात पसरावा लागतो. त्यातून त्याचे प्रचंड शोषण होते व त्याला कुणीही वाली राहिलेला नाही.
अशा काळामध्ये अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाति /जनजाति, आदिवासी इतर मागास वर्गीय शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी व शिवछत्रपतींच्या स्वप्नातील कृषिप्रधान राज्याची निर्मिती करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटना कटिबद्ध असेल.आसे मत अध्यक्ष नितीन दादा आरडे यांनी व्यक्त केले, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला.
टिप्पण्या