इंदापूरः येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन कोरोनाच्या महामारित अत्यंत साधेपणाने व नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान उद्देशिकेचे मा. प्रा. डी.आर.ओहोळ सर (राष्ट्रीय महासचिव,बामसेफ नवी दिल्ली), संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या हस्ते, तर घटनाकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा. महेश स्वामी आणि शिव- सृष्टीचे संपादक मा.धनंजय कळमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मा. हिरालाल चंदनशिवे यांनी संविधान उद्देशिकेचे प्रकट वाचन केले. आजचा कार्यक्रम मा. प्रा. डी.आर ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.मा. प्रा. डी.आर ओहोळ सर यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पत्रकार मा.महेश स्वामी आपल्या भाषणात म्हणाले की, संविधान दिनाच्या निमित्ताने आमचा पत्रकारांचा सत्कार होतोय. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही आमच्या पत्रकारितेतून शोषित, वंचित , गोरगरीब जनतेला शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आमच्या पत्रकारितेतून खंबीर भूमिका पार पाडू असे सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात नमूद केले.
रत्नाकर मखरे म्हणाले की, तळागाळातल्या माणसांसाठी मी गेली पन्नास वर्षे कार्यरत आहे. दोन पत्र्याच्या खोलीत सुरू केलेली शाळा तो प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला आहे. माझ्या श्वासात शेवटचा श्वास असे पर्यंत हे काम चालूच ठेवणार आहे. आयुष्यामध्ये माणसाकडून काही चुका होत असतात ज्या चुका क्षमा करण्यासारख्या असतात,त्याला क्षमा करायच्या असतात आणि क्षमा न करण्याजोग्या चुका मुळात होऊच द्यायच्या नसतात.बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे त्यासाठी बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचा देश बनला पाहिजे असे मत व्यक्त केले. संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली.असेही मखरे यांनी संविधान दिनानिमित्त आपल्या भाषणात नमूद केले.
पत्रकारांच्या सत्कारानंतर मखरे म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. माध्यमांचे काम माहिती देणे, प्रबोधन करणे हे आहे. लोकशाहीत माध्यमांच मोठं महत्त्व आहे. त्यामुळे ही माध्यमं टिकली पाहिजे. त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. माध्यमांचे काम सकळजनांना जागृत करणे हे आहे..माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचे व्रत सोडू नये अशी अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरू आहे, त्यावर तटस्थ भाष्य करून दिशा देणे अपेक्षित असते,म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही.तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं असेही सांगितलं जातं. पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भीडपणे सदसद विवेक जागृत ठेवून,ज्यांना स्वतःचा आवाज नाही,
ज्यांचा कुणी वाली नाही, त्यांचा आवाज होऊन,त्यांचा वाली होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत ,बहुसंख्यांकापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं असे अपेक्षित आहे. पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव मूकनायक असे ठेवलं होतं, असे आपल्या भाषणात शेवटी नमूद करून पत्रकारांचे मनापासून कौतुक करून रत्नाकर मखरे यांनी आभार मानले.
मा. प्रा. डी.आर ओहोळ सर आपल्या भाषणात म्हणाले की,७१ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत.जर आपल्याला खरंच संविधान समजून घ्यायचे असेल तर संविधानाची पार्श्वभूमी काय आहे? हे माहित हवं. आपल्याला केवळ संविधान शब्द इथपर्यंतच माहित आहे. ज्यांनी संविधान लिहिले त्यांचा काय उद्देश होता? न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वावरआधारावर नवा भारत उभा राहावा हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. मात्र हे उद्देश आज पूर्ण झालेत का? जर हे अपूर्ण असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची. ज्यांना कोणाला भारतीय संविधान समजून घ्यायचे आहे त्यांनी संविधानाचं वाचन केले पाहिजे आणि ते समजून घेतले पाहिजे अनुदानित आश्रमशाळेला अनुदान मिळण्यासाठी ८२ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करत उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. त्याची बातमी होऊन मग न्याय मिळतो. तर मग आपण आज स्वतंत्र आहोत का ? असा प्रश्न उभा राहतो. ज्यांनी बाबासाहेबांना शिकवले नाही त्यांचा नातेसंबंध नाही ते जाती धर्माचे नाहीत अशांना त्यांनी आपले गुरु मानले.जगातील सर्वात अतिउच्च पदवी बाबासाहेबांनी मिळवली होती.असे आपल्या भाषणात ओहोळ सर यांनी म्हटले आहे. संविधानाची सर्व माहितीचे विस्तृत विवेचन करत प्रत्येक पैलू समजावून सांगितला. बहुजन महापुरुषांचे विचार डोक्यात घ्या. आणि त्यानुसार आपले आचरण वागण्यातून दिसणं हे महत्त्वाचं असल्याचे ओहोळ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केलं. प्रा.ओहोळ सर पुढे म्हणाले की,पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीत पत्रकारांची भूमिका फार मोठी आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज शासन दरबारी पोहचविण्याची जबाबदारी पत्रकारांची असून त्यांना न्याय मिळवून देण्यात पत्रकार आपल्या लेखणीतून महत्त्वाची भूमिका बजावतात.असे प्रा. ओहोळ सर यांनी शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे. कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार महेश स्वामी, शैलेश काटे, काकासाहेब मांढरे,शिवसृष्टी न्यूज संपादक धनंजय कळमकर, जितेंद्र जाधव ,मल्हारी लोखंडे, कैलास पवार, दीपक खिलारे, तात्याराम पवार ,देवा राखुंडे, विजय शिंदे, सचिन खुरंगे, इम्तियाज मुलाणी,आबासाहेब उगलमुगले आणि सिद्धार्थ मखरे उपस्थित होते.मा. गोरख तिकोटे, भैलुमे काका, संचालक सौ. शकुंतला मखरे, अस्मिता मखरे, अनार्या मखरे तसेच प्राचार्या. अनिता साळवे आणि संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
मा. साहेबराव पवार (मुख्याध्यापक, भिमाई प्राथमिक आश्रमशाळा ) , मा. सविता गोफणे (उपप्राचार्या ) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सॅनीटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या